लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी…
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीष महाजन, आमदार देवयानी फरांदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
एआयच्या माध्यमातून मराठी साहित्य सर्वदूर पोहोचवणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे "चौथे विश्व मराठी संमेलन 2026"चे उदघाटन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, नाशिकमध्ये यावर्षी "भाषेचा कुंभ" भरला असून पुढील वर्षी "संस्कृतीचा कुंभ" भरणार आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या समस्त मराठी जणांना सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण देतो, विविध देशांमधून आलेले मराठी बांधव त्या-त्या देशांमध्ये मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मराठी माणूस कधीही संकुचित विचार करत नाही; तो नेहमी व्यापक दृष्टिकोन ठेवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत असतो. अशाच प्रतिभावान व्यक्तींना आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांचे महत्त्व आणि महात्म्य दोन्ही अधिक अधोरेखित झाले आहे. या व्यक्तींमुळे मराठीचा रथ असाच अविरत पुढे जात राहील आणि मराठीचे सर्व सारस्वत मराठी भाषेला व अस्मितेला जीवंत ठेवतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
नाशिकची भूमी ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देखील भूमी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषा शुद्धीकरणाचे काम केले. महापौर, विधानसभा, विधान परिषद यासह असे अनेक शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग एआयचा वापर करून आपले साहित्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे. तसेच महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकता यावी यासाठी एआयचा वापर करून लँग्वेज लॅब तयार करत आहोत.
0 Comments